Sunday, November 1, 2015

सात-आठ

      ऑगस्ट महिन्यात चिपळूणला गेलो होतो. शनिवारी तुफान पावसात भरपूर भटकलो. रविवारची सकाळ चांगली दुपारपर्यंत वाढवली होती. सासुबाईंच्या मस्त जेवणावर आडवा हात मारला. "आता झोपायचे नाही" असा अमृताचा ( माझी बायको) प्रेमळ सुचनावजा आदेश (सकाळ उशीरा संपली ना). बाहेर पाऊस चालूच त्यात लाईट गेलेली, मग करायचे तरी काय? चल पत्त्यांचे दोन डाव खेळू असे तिनेच सुचवले. आणि आम्ही सात-आठ खेळायला सुरवात केली.
      हो सात-आठ! आता अगदी रमी, तीन पत्ती, जजमेंट असे वरच्या इयत्तेतले डाव खेळायचे सोडून हा काय पहिलीतला सात-आठ, ते सुद्धा बायको सगळ्या डावात (पत्त्यांच्या) माहिर असताना. अहो बायकोबरोबर सात-आठ खेळायला काय धमाल येते सांगू, तर आमच्या खेळाची सुरवातच कोण आठ घेणार इथपासून झाली. मग दोन पानं - एक लहान आणि एक मोठ्ठ, अस अमृताने समोर धरले. मी एक पान खेचले आणि लगेच तीने दुसरे पान बाकी पत्त्यांत मिसळून "तु मोठ्ठे पान खेचलेच" असे सांगून माझ्यावर आठ दिले आणि खेळाला सुरवात झाली.
      पहिला डाव रडीचा म्हणजे त्यात काही नियम नक्की केले जसे हुकुम नसले तरी डाव फोडायचा नाही, खालचे पान बघायचे नाही इत्यादी. आणि मग खऱ्या डावांना सुरवात झाली. कधी चांगला हुकुम लागायचा तर कधी अगदीच फुटकळ पाने. कधीतरी अनपेक्षितपणे खालचे पान चांगले निघायचे आणि डाव पलटायचा. जोरूच्या गुलामावर राणीची मात होऊन हात मिळायचा. तर कधी तिच्या आवडीच्या इस्पिक एक्क्यावर माझ्या हुकमाच्या सत्तीने मात व्हायची. माझे हात ओढल्यावर तिच्या चेहऱ्यावर फुलणारे बदाम बघण्यासाठी कधीतरी मी चौकट राजा देखील बनायचो.
      असे एकामागून एक डाव रंगत गेले आणि अचानक 'आधी चहा घ्या' अशी सासूबाईंची हाक ऐकू आली. चहा? अरे वाजले किती? साडेपाच? बापरे! दोन वाजता खेळायला चालू केलेले. चक्क साडेतीन तास खेळत होतो आम्ही!  आता हा शेवटचा डाव. जो हात ओढेल त्याला काहीतरी दयायचे असे ठरले आणि डाव सुरू केला. तिकडे चहा थंड होत होता आणि इकडे पैजेच्या डावाची रंगत वाढलेली. शेवटी एका हुकुमाच्या सत्तीने माझी बत्ती गुल झाली आणि माझा एक हात ओढला गेला. आता मला अमृताला एक ........ दयायचय.

      तर असा हा सात-आठ चा डाव. दोघांचा. सोपा तरीही मजा आणणारा. मग कधी घेताय तुम्ही खेळायला? आणि हो, हात ओढल्यावर काहीतरी हटके दयायचे ठरवा :)
  

Thursday, August 20, 2015

कातर आठवणी

संध्याकाळची वेळ
कधीकधी आपण एकटेच असतो अंगणात खुर्ची टाकून बसलेले
हळूहळू सावल्या लांबवर होत जातात अन् अंधारात मिसळून जातात
अशावेळी मनावर पसरू लागतात
        काही कातर आठवणी 
        अगदी लहानपणापासूनच्या...

कधीतरी नकळत झालेला अपमान वा मनाविरुद्ध करावी लागलेली तडजोड
अपयशाची खंत तर कधी अपराधीपणाची बोच
नशीबाने थोडक्यात हुकलेली संधी असो वा कोणीतरी जाणीवपूर्वक केलेली उपेक्षा
कोणाशीतरी धरलेला अबोला तर कधी व्यक्तच न झालेल्या भावना
मिळालेला नकार तसेच नाईलाजाने केलेला स्वीकार
काही चुकलेली गणितं, कधीतरी बिघडलेला सूर
आपल्या जवळच्या व्यक्तीची भासणारी उणीव
करायचे राहून गेलेल्या गोष्टीची हुरहुर

जीव उदास होऊन जातो एकदम अशा कातर आठवणींनी
हळवा भूतकाळ पापण्यांवर जमा होतो मग

थोड्या वेळाने भानावर येतो आपण
तूळशीपुढे निरांजन लावले जाते
नकळत हात जोडले जातात
भगवंताचे नाम मुखी येते

कातर आठवणी मग जातात
            मनाच्या खोल कोपर्‍यात
 परत कातरवेळी मनावर पसरण्यासाठी....

Sunday, April 26, 2015

मेरे शौक और उनकी अबकी हालत

प्यारवाले पिक्चर तो मैने देखना छोड दिए है |
पडदे और असली जिंदगी का फर्क सेह नही पाता हू अब ||

चाय तो मैने पीना छोड दी है |
तुम जो दूध, शक्कर और चायपत्तीवाला गरम पानी पिलाती हो ||

बोलना तो मेरा बंद ही हुआ है |
अरे "जी हा", "करता हू", "लाता हू", "मेरी गलती थी" ये भी कोइ बोलना है ||

सिगरेट तो मै सिर्फ धुए के लिए जलाता हू |
किक तो तुम रोज मुझे मारती ही हो ||

जुआ तो मै ऐसे ही वक्त बिताने के लिये खेलता हू |
पुरी जिंदगी तो मैंने कब की दाव लगा ली है ||

दारु तो मै स्वाद के लिए लेता हू |
नशे को भी तो तेरा खौफ है ||

दोस्तों आपके मन की बात मैंने खुले आम कर दी है |
मेरे हिम्मत की दाद तो देदो,  बीबी कुछ दिनों के लिए ऑफलाईन चली गयी है ||

Friday, January 9, 2015

स्वप्नवत मावळत!

गेल्या शनीवारी माझा मुक्काम सासुरवाडीला होतो. मी आणि बायकोने (माझ्या) संध्याकाळी परशुराम या ठिकाणी फिरायला जायचे ठरवले (पार संध्याकाळपर्यंत चालणारी दुपारची झोप टाळून). तिथे समाधान वाटणारे, शांत आणि सुंदर देऊळ आहे. तसेच आजूबाजूच्या परीसरातून सूर्यास्त छान दिसतो. तर काय आमची तयारी सुरू झाली. बायको आरशाला भेटायला गेली आणि मी बायकोच्या ड्रेसशी माझा शर्ट मॅचिंग नव्हता म्हणुन घातलेला शर्ट मी काढून दुसरा शर्ट इस्त्री करून आणला. बायको फार सुंदर दिसत होती (कोणत्याही दडपणाखाली मी हे लिहित नाही आहे). "प्लेजर" मस्त चकाचक करून ठेवलेली होती. 5.15 च्या गोरज मुहूर्तावर आम्ही प्रस्थान केले.

परशुराम तसे चिपळूणहून जवळ आहे. शहर सोडले की वळणावळणाच्या मुंबई महामार्गा लगतच पण डोंगरावर आहे. मी "प्लेजर" मुद्दामच हळू चालवत होतो (का ते परतीच्या प्रवासात सांगेन). वाटेत बायको ती कधी कधी आणि किती किती वेळा तिथे गेली ते सांगत होती (मैत्रिणींबरोबरचे वर्णन मी जास्त मन लावून ऐकले).

देवळापाशी पोचलो. गाडी थोड्या अंतरावर लावली आणि पायर्‍या (पन्नासएक असतील) उतरुन देवळात गेलो. देऊळ खरच सुंदर आणि स्वच्छ आहे. बाजूलाच तळी आणि गोमुख आहे. प्रसन्न वाटले. भक्ती तर असतेच पण त्याचबरोबर शांती व तृप्ती मिळाली की अमृतानुभवच जणू. पायर्‍या चढून गाडीपाशी येईपर्यंत दमछाक झाली. सवय राहीली नाही ना आजकाल चढायाची (पायर्‍या). मग झकास कोकम सरबत घेतले. आता वेध लागले होते ते विसावा पाईंटवरून सूर्यास्त बघण्याचे...

रवीभाऊ आमच्यासाठी थोडावेळ रेंगाळलेलेच होते. पाईंटची जागा मस्तच आहे. महामार्गालगतच एका वळणावर थोडी मोकळी जागा आहे. समोर दरी असून दरीपलिकडे अजून एक डोंगर. मधल्या भागात  बारमाही वाशिष्ठी नदी, तिच्या बाजूने जाणारा रेल्वेमार्ग. खोर्‍यातील एक दोन गावे, हिरवीगार शेतं, त्यांचे हिरव्या रंगाच्या विविध छटांचे चौकोनी तुकडे. अप्रतिम नेपथ्य जमले होते सुर्यास्तासाठी! आणि हो एक छोटीशी टपरी पण होती तिथे.

तर काय आम्ही मोक्याचे टेबल पकडून बसलो. हवेत गारवा होता. आसमंत मावळतीच्या अगणित रंगछटांनी भरून गेला होता. हळूहळू सूर्य समोरच्या डोंगरापलिकडे अदृश्य झाला पण त्याचे रंग त्याच्या बरोबर न जाता काही काळ तसेच रेंगाळत राहीले. दरम्यान आमच्या समोर गरमागरम कांदा भजी व वाफाळता चहा आला. एका हातात बायकोचा हात आणि दुसर्‍या हातात चहाचा कप आणि समोर मावळतीच्या रंगांचा विलोभनीय आविष्कार! जसजसा काळोख पसरू लागला तसतशी खालच्या गावांतील दिव्यांनी दरी उजळू लागली. मागच्या बाजूने निशाकराने आपली एंट्री घेतली होती. संध्याकाळचा शो संपून रात्रीचा सुरू झाला होता

निघावेसे वाटतच नव्हते पण माझ्या नसले तरी बायकोच्या घड्याळाला काटे होते. परतीचा मार्ग धरला. गाडी हळूच चालवत होतो (गाडी हळू चालवली की बायकोचे तुमच्याकडे जास्त आणि ट्रॅफिककडे कमी लक्ष लागते.). गाडीवर लागणारी गुलाबी थंडी आणि कानाशी बायकोचे गोड आवाजात "शारद सुंदर चंदेरी राती" गाणे म्हणजे काय सांगू तुम्हाला, सोने पे सुहागा!      

   घऱ आले पण मन काहीकाळ तिथेच रेंगाळत होते, मावळतीच्या रंगांसारखे.......